झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे-डाॅ.विलास सोनवणे
click2ashti update-सध्या शहरात झाडांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येते.पण केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पडण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे.कारण झाडे जगली तरच शहराचे आरोग्य,पर्यावरण संतुलित राहणार आहे.खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे.त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.विलास सोनवणे यांनी केले.

शहरातील आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.विलास सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बेळगांव येथील रेणूका माता मंदिर परिसरात 100 वृक्षांचे वृक्षारोपण (टि गार्डसह) शनिवार दि.23 रोजी सकाळी 10 वा.करण्यात आले.यावेळी डॉ.सोनवणे बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर अॅड.निर्मला सोनवणे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष नवनीत कटारिया, डॉ.प्रकाश झांजे,बेलगांव सरपंच तात्यासाहेब शिंदे,अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक जेवे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, डॉ.नदिम शेख,बन्सीधर पोकळे,अशोक पोकळे,सिताराम पोकळे,जेष्ठ पत्रकार भिमराव गुरव,पत्रकार सचिन रानडे,गणेश दळवी,पतसंस्थेचे शाखाधिकारी काकासाहेब पोकळे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ.सोनवणे म्हणाले,झाडांमुळे कोणत्याही घराचे,बंगल्याचे सौंदर्य खुलते.एक प्रकारचा टवटवीतपणा जाणवतो. हीच बाब शहरासाठीही लागू आहे.

ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे असतात तेथील नागरिकांच्या चेह-यावर तजेलदारपणा असतो.युरोपमधील अनेक शहरांत वृक्षारोपणावर विशेष लक्ष दिले जाते.त्याचे कारणच तेथील नागरिकांमधील जागरुकता हे असावे. भारतात अलीकडील काळात वृक्षारोपणाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे.पण त्याचे प्रमाण अपेक्षेएवढे नाही.म्हणूनच जागतिक पर्यावरणदिनानिमित्त होणा-या मोहिमांचा अपेक्षित फायदा होत नाही.हे लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे,तरच झाडे जगतील.असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक शिंदे यांनी केले तर आभार सिताराम पोकळे यांनी मानले.