आष्टी तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जे खासगी कर्मचाऱ्यांच्याच ताब्यात तलाठ्यांची भेट झाली दुर्मिळ;अन् फोन झाले नॉटरिचेबल
गणेश दळवी आष्टी-तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना साहेब नाहीत,साहेब आताच गेले,साहेब आज आले नाहीत,साहेब मिटींगला गेलेत,हीच धून खाजगी कर्मचाऱ्यांच्या वतीने ऐकायला मिळते.तलाठ्यांच्या भेटीला नागरिकांना,शेतकऱ्यांना दोन दोन महिने वाट पहावी लागत आहे. त्यासाठी नागरिकांना आपली कामे करुन घेण्यासाठी तलाठी सज्जात बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांची मनधरणी करावी लागते.
याबाबत अधिक असे की,खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांचे प्रश्न तलाठी विचारतात व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि रक्कम खाजगी कर्मचाऱ्यां मार्फतच सांगितली जाते व त्यानुसार नागरिकांना रक्कम मोजावी लागते व त्यानंतरच कामे मार्गी लागतात.कामाच्या सुरुवातीपासून ते काम होईपर्यंत नागरिकांची व तलाठ्यांची भेट होईना.ही सर्व कामे तलाठी परस्परच तलाठी सज्जा कार्यालयातील खाजगी कर्मचारीच करीत असतात.तलाठी यांच्याशी नागरिकांची भेट तर दूरच राहिली मोबाईलवर संपर्क सुध्दा होत नाही.नागरिकांचे फोन घेत नाहीत.नागरिकांना तलाठी कार्यालयाला चकरा मारून कामे होत नाही ना तलाठ्यांची भेट होत नाही.अखेर तलाठी कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्यांपुढे हतबल होऊन त्यांनी
सांगेल ती रक्कम जमा करून मनधरणी करावी लागते.
तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना खाजगी कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी पर्यंत दिल्या जाणाऱ्या रक्कमेच्या हिस्स्याचा गणित आखून फेरफारसह अन्य कामाची रक्कम वसुली केली जाते.जर नागरिकांना फेरफारसह अन्य कामे करायचीच असेलतर नाईलाजाने खकम मोजावी लागते.नाहीतर नियमावर बोट ठेवून सहा सहा महिने फेरफार प्रलंबित ठेवले जाते.त्याला जेरीस आणून कायद्यात बसो अन्यथा न बसो पैसे दिल्याशिवाय फेरफार नाही. हे नियम आत्मसात करायला भाग पाडले जाते.पैसे घ्या पण काम करा अशी परिस्थिती तलाठी कार्यालयात येणाऱ्यांसमोर केली जाते.काम केल्याशिवाय पर्याय नसलेल्या नागरिकांना हतबल होऊन पैसे मोजावे लागतात.ही रक्कम खाजगी कर्मचाऱ्यांच्या मार्फत उघड उघड वसूल केली जात आहे.याकडे संबंधित वरिष्ठ विभागाचे अधिकारी हेतुपरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.दरम्यान अधूनमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळे रचून कारवाई कारण्यात आल्या आहेत.मात्र याचा काही फारसा परिणाम व वचक तलाठ्यांना राहिलेला नसल्याचे चित्र सुरू असलेल्या सद्यस्थितीच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सातबारा १५ रुपयातच देणे बंधनकारक
सातबारा असो की, गाव नमुना आठ अ असो या प्रमाणीत प्रतिची शासनाची फिस १५ रुपये आहे. १५ रुपयांचा सातबारा शंभर रुपयात देणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल.व तसेच महसुली अभिलेखात सातबारा फेरसाठी पैसे लागत नाही. यासंदर्भात तहसीलदार आष्टी यांच्याशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करु.
–बाळदत्त मोरे,नायब तहसीलदार आष्टी
न होणारी कामे पैशांनी होतात
तलाठी सज्जा कार्यालयात कामाला येणाऱ्या नागरिकांना तलाठ्याच्या भेटीला चकरा माराव्या लागतात. तरी पण तलाठीची भेट होत नाही. मात्र तो जेरीला येऊन पैसे घ्या पण काम करा अशी त्याची परिस्थिती होते. सर्व नियमात असताना सुध्दा त्याला कामासाठी पैसे मोजावे लागतात.तर ज्यांची कामे नियमात नसतात त्यांना माहीत असते पैसे द्या अन् काम करा.या धरतीवर ते लोक खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत तलाठीला पैसे पुरवतात व आपली न होणारी कामे पैशे देऊन करुन घेतात.
–संपत सायकडशेतकरी,आष्टी
आष्टी शहरातील तलाठ्यांची दुकानदारी बंद झाली पाहिजे यासाठी प्रयत्न व्हावा
आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,शेकापूर रोड,ईदगाह मैदान, मार्केट यार्ड,गणपती मंदीर परिसरात आष्टी शहरासह तालुक्यातील आदी गावांच्या तलाठ्यांनी तलाठी कार्यालयाच्या नावाने निनावी आप आपली दुकाने थाटली असून त्या ठिकाणी खाजगी स्वरुपाचे दोन दोन कर्मचारी कामासाठी व पैसे वसुलीसाठी नेमून तलाठी मात्र हायप्रोफाईलच्या भुमिकेत वावरताना दिसून येत आहेत.या तलाठ्यांची दुकानदारी बंद करण्यासाठी नव्याने रूजू झालेल्या तहसिलदार वैशाली नेमगोंडा पाटील यांच्यासमोर आवाहन आहे.