असं पहिल्यांदाच घडतंय? पर्यटनस्थळ जाहीर केल्याने लोकांचा विरोध;आष्टीत जैन समाजाने व्यवसाय बंद ठेऊन केला निषेध
नायब तहसिलदार शारदा दळवी यांना दिले निवेदन
आष्टी(प्रतिनिधी)-झारखंडमधील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी तीर्थ क्षेत्राला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्याने सकल जैन समाजाकडून संताप व्यक्त केला जातोय.सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे सांगत जैन समाजातील बांधवांकडून निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.या निर्णयाच्या विरोधात अनेक राज्यात आंदोलन होत असून याचे लोन आता महाराष्ट्राच्या कानाकोप-यात देखील पोहचले आहे.आष्टी तालुक्यातील जैन बांधवांनी नायब तहसिलदार शारदा दळवी यांना निवेदन देत व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे.
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा क्षेत्राचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज शहरातील जैन बांधवांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.श्री सम्मेद शिखर हे झारखंडमधील जैन समजाचे तीर्थक्षेत्र आहे.या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.मात्र जैन समाजाकडून या निर्णयाला विरोध असल्याकारणाने आज शहरातील दुकाने बंद पाहायला मिळाली.हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा जैन धर्माच्या व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जैन समाज बांधवांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली आहेत.या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाजातील महिला त्याचबरोबर पुरुष सहभागी झाले होते.