व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दौरे करणा-या आजी-माजी आमदारांनी दहा वर्षात मतदारसंघात काय दिवे लावले-सुरेश धस

आष्टी येथील निर्धार बैठकीत धसांनी डागली विरोधकांवर तोफ

0

आष्टी click2ashti-सध्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून,आष्टीतील आजी-माजी आमदार यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.मात्र यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाचे काय दिवे लावले? गेल्या दहा वर्षांमध्ये आष्टी तालुक्यामध्ये किती शाळा खोल्या बांधल्या? अनेक ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे आहेत.तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका किती दिवसापासून घेतल्या नाहीत? याचे उत्तर आगोदर द्या आणि मग मतदार संघात निवडणूकीचे दौरे करा असे आवाहन माजी मंत्री सुरेश धस यांनी आमदार आजबे माजी आ.धोंडे यांना केले आहे.
आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात रविवार दि.२९ रोजी दुपारी २ वा.आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या निर्धार बैठकीत माजीमंत्री सुरेश धस बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले,विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून,खुंटेफळ साठवण तलावामध्ये आणखी चार टीएमसी पाणी तर शिरूर व पाटोदा तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी आणून संपूर्ण मतदारसंघात सुजलाम सुफलाम करणार असल्याचेही धस यांनी सांगितले.तसेच गेल्या दहा वर्षापासून मी या मतदारसंघाचा आमदार नाही.तरीही लोकांना व कार्यकर्त्यांना अजून मीच आमदार असल्यासारखे वाटत आहे.आष्टी मध्ये सध्या आजी-माजी आमदारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे सुरू केले आहेत.मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी दहा वर्षांमध्ये काय विकास केला हे सांगावे.आष्टी तालुक्यामध्ये किती शाळा खोल्या मंजूर केल्या.संजय गांधी निराधार योजनेच्या किती महिन्यापासून बैठकाच नाहीत.त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत.अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने पालक वर्ग रस्त्यावर उतरला आहे.अशीच अवस्था तालुक्यातील अनेक शाळांची झालेली आहे.अधिकाऱ्यावर नियंत्रण नसल्याने साध्या वारसाच्या नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून दहा-दहा हजार रुपये घेतले जात आहेत. याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे असे आवाहन सुरेश धस यांनी केले.कोरोनाच्या काळामध्ये विरोधक घरामध्ये बसलेले असताना मी मात्र वर्षभर माझ्या घरापासून व माझ्या कुटुंबापासून दूर राहून लोकांना वाचविण्याचे काम केले.मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या माध्यमातून तेरा ठिकाणी हॉस्पिटल तर 33 ठिकाणी कोविड सेंटर उभारून लोकांना जीवदान देण्याचे काम केले.विरोधकांनी तर फक्त शेवग्याच्या शेंगा वाटल्या. त्याही लोकांनी फेकून दिल्याची उपरोधिक टीका आमदार धस यांनी केली.मी शेकडो रेमडिसिवर इंजेक्शन वाटले.मात्र फोटो कधीही काढला नाही.मात्र विरोधकांनी एक रेमडिसवर इंजेक्शन वाटून फोटोचा सिलसिला सुरू केला होता.माझी लहान मुलगी व आई आजारी असताना सुद्धा मी वर्षभर लोकांमध्ये फिरून कोरोनाच्या रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले.आष्टी मध्ये फक्त सिमेंट वाळू व पेव्हर ब्लॉगचा विकास झाला असून तेही त्यांच्याच माध्यमातून झाल्याचा आरोप त्यांनी केला.मी सीनामेहकरी योजनेचे काम 97% केले.मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन त्या योजनेचे बटन दाबले व भीमराव धोंडे या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका नाव न घेता त्यांनी केली.या खुंटेफळ योजनेमध्ये 1.68 टीएमसी पाणी येणार आहे मात्र एवढ्यावर समाधान होणार नसून आणखी चार टीएमसी पाणी आणेपर्यंत पर्यंत मी शांत बसणार नाही. तसेच पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी जायकवाडीतून पाणी आणून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.सन 2012 साली मी मंत्री असताना फळबाग योजनेसाठी जो जीआर काढला त्या योजनेचे फायदे आत्ता शेतकऱ्यांना मिळत असून फळबागामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी आता सुखी झाला आहे.मी मतदार संघात जे काम केले त्याचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदे झाले असल्याचेही धस यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माऊली जरांगे यांनी करून आभार मानले‌.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.