जरांगेंना डाऊन करण्यासाठी धसांना पाठिवले : आव्हाड
मुंबई । प्रतिनिधी
तुम्ही फक्त घाबरवण्याचे काम केले. ओबीसींना घाबरवले. मराठ्यांना घाबरवले. तुम्ही तुमच्या घरात सुखी राहा, मी माझ्या घरात सुखी आहे. तुमच्या एकाही प्रश्न मला उत्तर द्यायचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनोज जरांगे यांना डाऊन करण्यासाठी आमदार सुरेश धस यांना पाठविले असा आरोप केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चावरुन आमदार धस आिण जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आ.धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी मोर्चा प्रकरणी आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचा धंदा जमतो का अशी जोरदार टीका केली होती. यावर आव्हाड यांनी उत्तर देत मराठा समाजात फूट पाडण्यासाठी, मनोज जरांगे यांना डाऊन करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर नाव न घेता केला. तुम्ही काढा मोर्चे. आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला मनोज जरांगे यांना कापण्यासाठी पाठवले आहे. जरांगे यांना डाऊन करण्यासाठी हे प्यादे बाहेर काढले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी पाठवले आहे. लोकांना हे समजत नाही का? लोक काय मूर्ख आहेत का? तुम्हाला मोर्चाबद्दल इतके प्रेम आहे का? आतापर्यंत हजारो मोर्चा निघाले आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. दरम्यान संतोष देशमुख प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू, अक्षय शिंदे एन्काऊंटरवरुन धस, आव्हाड यांच्यात जुंपली असल्याचे दिसून येते.