व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सोलापूर-संभाजीनगर, येडशी-जालना रेल्वेमार्गाचे पुन्हा होणार सर्व्हेक्षण

0

बीड: दि.१० फेब्रुवारी रोजी येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, यासाठी, खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा दि.१३ रोजी भेट घेवून दक्षिण-उत्तर दिशाना जोडण्यासाठी दोन्ही मार्ग महत्वाचे असल्याचे पटवून दिले. यानंतर रेल्वेमंत्री यांनी तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.

अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गाचे काम बीडपर्यंत आले असून हा मार्ग परळीपर्यंत जोडल्याने पुर्व-पश्चिम विभाग जोडले जात आहेत. तर दक्षिण-उत्तर दिशांना बीड रेल्वेने जोडण्यासाठी दि.१३ फेब्रुवारी रोजी खा. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची संसद भवन कार्यालयात भेट घेतली. यावेळी दक्षिण-उत्तर दिशांना जोडण्यासाठी येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग कसा महत्वाचा आहे, हे पटवून दिले. हा मार्ग जोडला तर मराठवाड्यात बीड हे मध्यभागी येवून बीडचा विकास झपाट्याने होईल. याठिकाणी मोठे उद्योग व्यवसाय नाहीत. रेल्वेमार्ग जोडला तर येथील उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि येथील नागरिकांच्या हाताला काम मिळेल, असे म्हटले. लोकसभा निवडणूकीच्या विजयानंतर तातडीने अहिल्यानगर परळी रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी बैठक घेत कामाला कालमर्यादा ठरवून दिली होती. आता अहिल्यानगर बीड अशी रेल्वे धावू लागली असून येत्या काही दिवसात बीड-अहिल्यानंतर रेल्वे सुरू होणार आहे. दरम्यान, येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, यासाठी दि.१० फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेवून चर्चा केली होती. यावेळी मंत्री वैष्णव यांनीही सकारात्मकतेने या मार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. यानंतर दि.१३ रोजी खा.सोनवणे यांनी दोन्ही मार्गाची सविस्तर माहिती असलेला अहवाल केंद्रीय मंत्र्यांना दाखविला. याआधी धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण झालेले आहे. दरम्यान, येडशी-जालना या रेल्वे मार्गाचेही सर्व्हेक्षण करून दोन्ही पैकी जो सुलभ मार्ग असेल तो विचारात घेवू, असे मंत्री वैष्णव यांनी म्हटले. भेटीदरम्यान, रेल्वेअधिकाऱ्यांना बोलावून तातडीने दोन्ही रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेशही दिले. जिल्ह्यात राजकिय धुळवड सुरू असताना खा.बजरंग सोनवणे हे जिल्ह्याच्या विकासासाठी पायाला भिंगरी लावून काम करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.