मुलींने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,आई-बापावर जिवापाड प्रेम करावं-प्रा.वसंत हंकारे
आष्टी click2ashti-जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे,तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा,आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी केले.

आष्टी येथील पंचायत समिती प्रागाणात गुरूवार (दि.20) रोजी युवानेते तथा जामगांवचे सरपंच राधेश्याम धस यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधत महाराष्ट्राचे प्रमुख व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचे भरकटलेली तरूणाई व न समजलेले आई-बाप समजून सांगताना ते बोलत होते.यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर,माजी जि.प.सदस्य देविदास धस, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,माजी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे, मुर्शदपुरचे सरपंच अशोक मुळे,आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे,सुमतीलाल मेहेर,अॅड.बाळासाहेब मोरे,अतुल मेहेर,सचिन लोखंडे,गौतम आजबे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना प्रा.हंकारे म्हणाले,कोणत्याही मुलीने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,जिवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांची मान खाली जाणार नाही,याची काळजी घ्यावी.आई-बापासारखे खरे प्रेम आपल्यावर जगात कोणीच करू शकत नाही.

मुलांना घडविण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला ‘बाप’ ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करीत असतो.स्वतःफाटके कपडे घालून मुलांना ब्रॅन्डेड कपडे देणारा बापच असतो.बापाची किंमत काय असते,हे अनाथाश्रमातील मुलांना विचारा,असेही हंकारे म्हणाले.या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.