मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव
नगर I प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. यात्रेचा काळ हा आमच्यासाठी दुखवट्याचा काळ असतो, मात्र मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत आणि त्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे. होळीपासून मढीच्या यात्रेला सुरवात होते तर गुडीपाडव्याला सांगता होत असते.
सरपंच संजय बाजीराव मरकड म्हणाले की, मुस्लिम व्यापाऱ्यांचे या ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू असतात. त्यांच्याकडून भाविकांची लूट होते. या आधी भाविकांना मारहाणही करण्यात आली होती. अशा भाविकांनी, ग्रामस्थांनी आमच्याकडे पत्रं लिहित मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आता कानिफनाथांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.