जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आष्टी नगरी सजली;पन्नास जेसीबीने होणार पुष्पवृष्टी
एक हजार स्वयंसेवक तयारीत मग्न
click2ashti update-शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले असून सकल मराठा समाजा कडून विराट सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी एक मराठा समाजाचे एक हजार स्वयंसेवक गेल्या चार दिवसापासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. जरांगे पाटलांच्या रॅलीवर पन्नास जेसीबीच्या साह्याने यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या सभेच्या रूपाने आरक्षणाची मशाल पेटणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांचे प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला चाळीस दिवसांचा वेळ संपत आलेला आहे. त्यामुळे मराठा समाजात पुन्हा एकदा आंदोलनाची धग पेटवण्यासाठी मनोज जरांगे यांची ही सभा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. संपूर्ण मराठा समाजाचे आता 14 तारखेला आंतरवाली येथे होणाऱ्या सभेकडे डोळे लागले आहेत या सभेची समाजातील प्रत्येक तरुणास उत्सुकता लागून राहिली आहे याच सभेमध्ये मराठा समाजासाठी आरपारची लढाई असल्याने प्रत्येक गावागावांमध्ये तरुण वर्ग हा आता आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे आरक्षणामुळे मराठा समाजाचे आजपर्यंत अतोनात असे नुकसान झाले असून यापुढे हे नुकसान होऊ न देण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची हीच वेळ असल्याने आष्टी शहरातील मनोज जरांगे पाटील यांची सभा ऐतिहासिक होणार आहे.या सभेसाठी गेल्या पाच दिवसापासून आष्टी तालुक्यातील गाव,वस्ती,वाडी यामध्ये समाजाचे युवक फिरत असून कॉर्नर बैठका,गाव बैठका,चावडी बैठका घेऊन आष्टीच्या आज होणाऱ्या सभेचे नियोजन पूर्ण केले आहे.न भूतो न भविष्यती अशा होणाऱ्या या सभेसाठी युवक वर्गाची उपस्थिती लक्षणीय असणार आहे.