आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले : आ.सुरेश धस
बीड । प्रतिनिधी
परळीत किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली जातात. मात्र याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. महादेव मुंडे हत्या प्रकरणतही पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आकाच्या आवडत्या लोकांनी महादेव मुंडेंचे जीवन संपवले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
आ.धस यांनी आज परळी येथे स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धस म्हणाले की, तत्कालीन पोलीस निरीक्षक रवी सानप हत्या करणाऱ्यापर्यंत पोहोचले होते. महादेव मुंडे यांचा खून झाला. मात्र त्यांची गाडी घेऊन जाण्यात आली ज्यात सर्व साहित्य होते. नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा आहे ते यातील आरोपी अटक करतील. तसेच या प्रकरणाची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्याकडे करणार, अशी माहिती देखील सुरेश धस यांनी दिली. परळी बदनाम का होते याकडे लक्ष द्या… महादेव मुंडे हा एकटा आहे का प्लॉटिंगचा व्यवसाय करणारा?, असा सवालही सुरेश धस यांनी उपस्थित केला. या प्रकरणात आकाचा संबंध आहे किंवा पोलिसांनीच आमचा माणूस मारला आहे. या प्रकरणात पोलीस मिळालेले आहेत. त्याशिवाय एवढा मोठा खून होणार नाही, असा दावाही सुरेश धस यांनी यावेळी केला. राजस्थानी मल्टीस्टेट बँकेमुळे सहा लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. मी ज्ञानेश्वरी मुंडे यांना विनंती करतो त्यांनी आपले उपोषण चार ते पाच दिवसांनी पुढे ढकलावे. या प्रकरणात काहीतरी प्रगती होईल मी स्वतः यात लक्ष घालत आहे. त्या उपोषणावर ठाम राहिल्या तरी मी त्यांच्याबरोबर राहील. मात्र विनंती त्यांनी आठ दिवसांची मुदत द्यावी, असं सुरेश धस यांनी सांगितले.